#Covid-19: भारताला दिलासा, कालच्या बाधितांची संख्या दोन लाखांच्या आत
मुंबई |
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही कायम आहे. मात्र त्यातच दिलासादायक गोष्ट अशी की, काल दिवसभरात देशात आढळलेल्या नव्या बाधितांची संख्या दोन लाखांच्या आत आहे. बाधितांचा हा आलेख असाच उतरता राहिला, तर निश्चितच ही दुसरी लाट थोपवता येईल.
- नजर टाकूया देशातल्या काल दिवसभरातल्या आकडेवारीवर…
देशात काल दिवसभरात एक लाख ८६ हजार ३६४ नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन बाधितांची संख्या यापेक्षा निश्चितच अधिक होते. गेल्या आठवड्यात तर ही संख्या तीन लाखांच्याही वर होती. देशात सध्या २३ लाख ४३ हजार १५२ रुग्ण उपचाराधीन आहेत.
तर काल दिवसभरातल्या नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. काल देशातले दोन लाख ५९ हजार ४५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९०.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात काल दिवसभरात तीन हजार ६६० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता तीन लाख १८ हजार ८९५वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० वर पोहोचली आहे. देशात सध्या २३ लाख ४३ हजार १५२ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर आत्तापर्यंतच्या एकूण करोना रुग्णांचा आकडा आता दोन कोटी ७५ लाख ५५हजार ४५७ वर पोहोचला आहे. आकडे कमी होत असले तरी अजूनही करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनीच मास्क वापरणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतराचा नियम पाळणे अनिवार्य आहे.