वीजपुरवठ्याच्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुक
![Chief Minister Uddhav Thackeray appreciates the war-level work of power supply](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/udhhav-thakrey.jpg)
सावंतवाडी |
‘तौक्ते’ चक्रीवादळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा दिल्याने वीजयंत्रणेचे जबरदस्त नुकसान झाले आहे. त्यात करोना संसर्गाची आपत्कालीन परिस्थिती असल्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, मोबाईल टॉवर, पाणीपुरवठा, घरगुती व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने नियोजनबद्ध सुरु केलेल्या युद्धपातळीवरील कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी दौऱ्यात कौतुक केले.‘तौक्ते’ चक्रीवादळाने मुसळधार पावसासह प्रामुख्याने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ६७८ गावांमधील वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा सिंधदुर्ग जिल्ह्याला बसला. करोना महामारीच्या काळात येथील २५ कोविड रूग्णालये व सिंधदुर्ग जिल्हा सामान्य रूग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या दवाखान्यातील ८५ टक्के रूग्ण करोनाने बाधित होते.
जिल्ह्यात सर्वत्र मोठमोठी झाडे वीज वाहिन्यावंर पडल्याने वीज यंत्रणा जमिनदोस्त झाल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असतांना जीवाची कुठलीही पर्वा न करता महावितरणने युध्दपातळीवर काम करून २४ तासांच्या आत जिल्हा सामान्य रूग्णालयाचा वीजपुरवठा सुरळीत केला. अशा कठीण परिस्थितीत महावितरणने केलेल्या कामांचे मुख्यमंत्री ना.श्री उध्दव ठाकरे यांनी आज कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या रत्नागिरी व सिंधदूर्ग या दोन जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यानंतर रत्नागिरी व सिंधदूर्ग या दोन्ही जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे राज्यातील रत्नागिरी, सिंधदूर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूर, पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
विशेषत: सिंधदूर्ग जिल्ह्यांतील वीजयंत्रणेच्या दुरूस्तीचे कामे तातडीने व्हावीत यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विशेष लक्ष देत बारामती, कोल्हापूर व औरंगाबाद येथील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ व साहित्य पाठविण्याचे निर्देश दिले होते. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सिंधुदूर्ग येथील वीजयंत्रणेच्या दुरूस्तीच्या कामांचे समन्वय साधण्यासाठी मुंबई मुख्यालयातील दोन मुख्य अभियंत्याना पाठविण्यात आले. कोल्हापूर, पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यांचा ९८ टक्के वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार २३९ गावांपैकी १ हजार २१२ तर सिंधदूर्ग जिल्ह्यातील ४३९ गावांपैकी ३४४ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित गावांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे या चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधदूर्ग, कोल्हापूर, पुणे, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील ३०६ कोविड रूग्णालये व लसीकरण केंद्राचा तसेच १४ ऑक्सिजन रीफीलींग प्लांटचा बाधित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चक्रीवादळ परिस्थितीमुळे वीज प्रणाली खंडित झाली होती. यामध्ये ४३९ गावातील वीज बंद होती. आज सायंकाळी पर्यंत ३६७ गावात वीज पुरवठा सुरळीत चालू झाला आहे. मात्र अद्यपपर्यंत ७२ गावात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वीज वितरण कंपनीने याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. जिल्ह्यातील ३१ उपकेंद्र आहेत,ती सुरू झाली आहेत.ट्रान्सफॉर्मर ३४२१ पैकी २००६ सुरू झाले आहेत तर १४१५ सुरू होणे बाकी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण वीज कनेक्शन ३०६६११ पैकी २१०७५३ सुरू झाली व ९५८५८ सुरू होणे बाकी आहेत.एचटी पोल ४६१ बाधित होते. त्यापैकी २५६ सुरू झाले तर २०५ शिल्लक आहेत. एलटी पोल १७२६ बाधित आहेत त्यापैकी १३८४ सुरळीत झाले आहेत.