काँग्रेस आक्रमक झाल्यानंतर चंद्रकांत खैरेंनी घेतली माघार
औरंगाबाद । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्यास भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचा दावा खरैंनी केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हुशार असून २२ काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी तयार केले असल्याचे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. पटोले आक्रमक झाल्यानंतर खैरेंनी आपल्या विधानातून माघार घेतली.
चंद्रकांत खैरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपची काय निती सुरू आहे, त्याबद्दल मी बोललो. हे वर्तमान पत्रात आलं आहे, त्याचा मी उल्लेख करून सांगितला होता. काँग्रेसचे २२ आमदार फुटणार हे कधीही मी बोललो नाही. परंतु हे शब्द मी बोललो असेल तर त्या विधानातून माघार घेतो, असं खैरे म्हणाले.
ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतर पक्षांबद्दल काहीही बोलू नये, असं नाना पटोलेंनी चंद्रकांत खैरेंना सुनावलं. नाना पटोले यांच्या आक्रमक भुमिकेनंतर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीदेखील खैरेंवर निशाणा साधला. खैरे हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी असे वक्तव्य का केले, याचा खुलासा करून माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
शिंदे गटातील १६ आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरवल्यास फडणवीस यांचा प्लॅन बी तयार आहे. त्यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. ते सर्व भाजपमध्ये प्रवेश करतील आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा दावा खैरेंनी केला होता. तसेच या २२ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल, असं चंद्रकांत खैरे म्हणाले होते. भविष्यात महाराष्ट्रात काय होणार आहे याची ब्ल्यू प्रिंटही फडणवीस यांनी काढली आणि केव्हाही निवडणुका होऊ शकतात, असेही खैरे म्हणाले.