चऱ्होली बुद्रुकच्या वीज समस्यांबाबत भाजपा किसान मोर्चा आक्रमक
![BJP Kisan Morcha is aggressive about Charholi Budruk's power problems](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-10-at-7.27.56-PM.jpeg)
- शहराध्यक्ष संतोष तापकीर यांचा प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
- कार्यकारी अभियंता आर. के. गवारे यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनियमित भारनियमन, पावसामुळे निर्माण होणारे विद्युत विषयक प्रश्न, महावितरण अधिकाऱ्यांची टाळाटाळ अशा अनेक समस्यांमुळे चऱ्होली बुद्रुक प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक हैराण झाले आहेत. याची दखल घेत भारतीय जनता किसान मोर्चा पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून आठ दिवसात प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा किसान मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष तापकीर यांनी दिला आहे.
याबाबत महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.गवारे, अतिरिक्त अभियंता विकास अल्लाट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पिंपरी- चिंचवड किसान मोर्चा शहराध्यक्ष संतोष तापकीर, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामदास बापू काळजे, उद्योजक सुरेश निकम, वासुदेव शिंदे आदी उपस्थित होते.
चऱ्होली बुद्रुक प्रभाग क्रमांक चार या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचप्रमाणे खंडित झालेला वीजपुरवठा हा मर्यादित वेळेमध्ये पूर्ववत होत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला असता अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत तसेच अनेकदा फोनही उचलत नाहीत. या परिसरात अनेक सोसायट्या व कॉलनीसह मोठी लोकवस्ती आहे. तसेच सर्व नागरिक वेळेत वीजबिल भरत असतानाही त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे येथील काही भागातील वीजपुरवठा सलग तीन ते चार दिवस खंडित होता. इतके दिवस सलग वीजपुरवठा खंडित होणे हे महावितरण कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याबरोबरच विद्युत पुरवठा दाब अनेकदा कमी जास्त होत असल्याने घरातील फ्रीज, टीव्ही, वॉशिंग- मशीन, पंखे यासारख्या उपकरणांमध्ये बिघाड निर्माण होत आहे. यामुळे याबाबत पाहणी करून उपाययोजना करावी, वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करावी, नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, तसेच विद्युत दाब सुरळीत राहावा याबाबत उपयोजना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- … तर महावितरण जबाबदार
या परिसरात नागरिकांसह शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. विजसमस्येमुळे शेतीचे नुकसान होत आहे. हा प्रकार गंभीर आहे. तसेच विजेची ही समस्या वर्षानुवर्षे जैसे थे आहे. याची दखल घेऊन येत्या आठ दिवसात याबाबत उपाययोजना न केल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच होणाऱ्या नुकसानिस संबंधित महावितरण अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.