‘..आम्ही उठलो की सरकार कोसळणार!’ बच्चू कडू यांचं मोठं विधान
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा आपलंच सरकार येईल, असा दावा केला जात आहे. दरम्यान, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. प्रहारचे १०-११ आमदार निवडून येतील असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते सातारा येथे माध्यमांशी बोलत होते.
आमदार बच्चू कडू म्हणाले, आमचे १०-११ आमदार निवडून येतील. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल. आम्ही उठलो तर सरकार उठेल. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून १५ जागा मागणार आहे. १५ जागा मिळतील का?, असा सवाल केला गेला. यावर ते म्हणाले, तो अभ्यास त्यांनी करावा. ते माझे काम नाही, असं बच्चू कडू म्हणालेत. त्यामुळे येत्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहारला युतीत किती जागा मिळतात आणि किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं महत्वाचं असेल.
हेही वाचा – ग्राऊंड रिपोर्ट : ‘मावळ’ साठी संजोग वाघेरे यांनी फुंकले रणशिंग!
दरम्यान, दोन दिवसांपुर्वी बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्र सरकारला नामर्द संबोधलं होतं. केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय. कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं. म्हणून तुम्ही एवढे घाबरता का? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.