‘सरकारला दिलेला शब्द पाळता येत नसेल तर..’; बच्चू कडूंचा घरचा आहेर
![Bacchu Kadu said that it is very unfortunate that the government has not kept its promises](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Bacchu-Kadu-1-780x470.jpg)
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम दिला होता. परंतु, दिलेल्या मुदतीत सरकारला हा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आमदार बच्चू कडू म्हणाले, सरकारने मनोज जरांगे यांना काही शब्द दिले होते. परंतु, सरकारला ती आश्वासनं पूर्ण करता आली नाहीत, हे दुर्दैवी आहे. मुळात सोयरे म्हणजे जिथे आपली सोयरीक होऊ शकते. आपली सोयरीक आपल्या जातीत होते, असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. परंतु, सरकारने सोयरे शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. त्यामुळे आधी सोयरे या शब्दाची व्याख्या करणं गरजेचं आहे. व्याख्या झाली तर आपल्याला पुढे जाता येईल.
हेही वाचा – मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पंड्या IPL२०२४ मधून बाहेर?
मागच्या बैठकीवेळी आपण सरकारला काही शब्द दिले, सरकारनेही आपल्याला काही शब्द दिले होते. परंतु, सरकारने दिलेले शब्द पाळले नाहीत, हे खूप दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठा समाजाला असं वाटतं की मागच्या वेळी झाली तशी फसणवूक आता होऊ नये. सरकारला आता जर एखाद्या शब्द द्यायचा असेल तर आधी त्याचा पूर्ण विचार करून द्यावा. शब्द दिला आणि तो पूर्ण करू शकलो नाही तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. लोकांच्या मनात सरकारविरोधात भावना निर्माण होतात. उग्र प्रतिक्रिया उमटू लागतात, असंही बच्चू कडू म्हणाले.