जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमुळे अण्णा हजारे भडकले; म्हणाले..
![Anna Hazare said that he would file a claim for damages against Awada after taking the advice of lawyers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Anna-Hazare-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो शेअर करत, या माणसानं देशाचे वाटोळं केलं, असं म्हटलं आहे. दरम्यान, यावरून अण्णा हजारे चांगलेच भडकले आहेत. वकिलांचा सल्ला घेऊन अव्हाडांविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकू, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
अण्णा हजारे म्हणाले, माझ्यामुळं देशाचं वाटोळं झालं, असं म्हणायचं. पण, मी केलेल्या कायद्यामुळे जनतेचा फायदा झाला. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. माझ्या आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं, हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले. कदाचित ते त्यांना सहन होत नाही.
हेही वाचा – World Cup 2023 : भारतीय संघाला मोठा धक्का! शुबमन गिल पहिल्याच सामन्याला मुकणार?
त्यामुळे काहीतरी कुरापती करायच्या, बदनामी करायची. मात्र, काही फरक पडत नाही. वकिलाचा सल्ला घेऊन ‘वाटोळं केलं’ म्हणणाऱ्याविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकणार, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
जितेंद्र अव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो शेअर केला आहे. त्यावर आव्हाडांनी लिहिलं होतं की, या माणसानं देशाचं वाटोळं केलं. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही.