अजित पवारांना आता मोदीही वाचवू शकणार नाहीत; अंजली दमानियांचा मोठा दावा

Anjali Damania | पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मेघदूत बंगल्यावर दमानिया व बावनकुळे यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत, असं वक्तव्य दमानिया यांनी केलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, जरंडेश्वर साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याच्या फाईल्स हळूहळू बाहेर काढणार आहे. मी यावेळी ठरवलं आहे की मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यातून वाचवलं. मात्र, यावेळी त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही.
हेही वाचा : पुढील दोन दिवस सावधानतेचे, राज्यात पाऊस अन् थंडीची लाट, अलर्ट जारी
मी जे घोटाळे बाहेर काढणार आहे, जे पुरावे सादर करणार आहे, ते केल्यानंतर आता अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणाकडेही गेले तरी त्यांना कोणी वाचवू शकणार नाही. मी याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशांद्वारे कारवाई होईल याची काळजी घेणार आहे. एकाही खटल्यामधून त्यांना बाहेर येऊ देणार नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.




