अंधेरी पोटनिवडणूक ः नोटाला जास्त मतं का पडली? ठाकरे गटाचे ‘चाणक्य’ अनिल परबांनी सांगितलं कारण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Anil-Parab.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना माघार घ्यायला सांगितली असली तरी नोटा या पर्यायाला मतदान करण्यासाठी पडद्यामागून प्रचार केला. तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यावरुन मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे दिसून आलं. या पोटनिवडणुकीने मुंबईतील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सिद्ध केले. तसेच महाविकास आघाडी एकत्र आली तर काय करु शकते, हे अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीनंतर ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मशाल हे चिन्हा घेऊन पहिला विजय मिळवला आहे. पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह घेऊन शिवसैनिकांनी पोटनिवडणुकीत जो प्रचार केला, काम केलं, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी पैसे देऊन नोटाचा प्रचार केला जात होता. कायद्यानुसार नोटाचा प्रचार करता नाही. नोटाचा वापर हा ऐच्छिक आहे. ज्याला वाटतं वरीलपैकी कोणताही उमेदवार योग्य नाही, त्याला नोटाचं बटण दाबण्याचा अधिकार आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी काही ठिकाणी पैसे देऊन नोटाचा प्रचार सुरु होता. आम्ही पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. मी स्वत: निवडणूक आयोगाकडे नोटाचा प्रचार सुरु असतानाचा व्हिडिओ दिला होता. लेखी सूचनाही दिली होती. मात्र, पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नोटाला मिळालेली मतं, ही गैरमार्गाने मिळवण्यात आली आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला.
यावेळी अनिल परब यांनी भाजपवरही टीकास्त्र सोडले. भाजपच्या मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतू माघार घेतली होती. यासाठी आम्ही भाजपचे आभारही मानले होते. पण एका बाजूने उमेदवार मागे घ्यायचा आणि दुसरीकडे नोटाचा प्रचार करायचा, हे योग्य नाही. भाजपने ऋतुजा लटके यांना पाठिंबाही दिला नव्हता. अंधेरी पूर्व निवडणुकीत झालेला नोटाचा प्रचार, ही बाब खटकण्यासारखी होती, असेही अनिल परब यांनी म्हटले.