नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? अमित ठाकरेंची जोरदार टीका

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सध्या राजकीय महाशर्यत रंगली असून, नगरसेवकांच्या जुळवाजुळवीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक पळवापळवीचे प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, राज्यात पुन्हा एकदा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
महापौर निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेने त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना मुंबईतील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. १७ तारखेपासून सलग तीन दिवस हे नगरसेवक हॉटेलमध्येच वास्तव्यास आहेत. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलमधील इतर पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड
या संपूर्ण प्रकारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र शब्दांत टीका केली आहे. “नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी म्हटले आहे की, निकाल लागल्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानणे आणि लोकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात करणे अपेक्षित होते. मात्र, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद असल्याची स्थिती आहे, असे त्यांनी नमूद केले.
याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होत? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय, असं अमति ठाकरे म्हणाले.
लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा, असं आवाहनही त्यांनी केलं.




