‘एकनाथ शिंदेंनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं’; अमित ठाकरेंचं विधान

Amit Thackeray | २०२१ ला शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोरी सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. त्यामुळे शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलं. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
अमित ठाकरे नेमकं का म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं चिन्ह आणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं. नागरिक म्हणून पाहताना ते मला चुकीचं वाटतंय. पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचं आहे, ते त्यांचंच राहायला पाहिजे होतं. लोकांच्या विश्वासाने त्यांनी हे निर्माण केलं होतं.
हेही वाचा – ‘मी आर.आर. पाटील कुटुंबाची माफी मागितली’; अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत
२०२१ ला नेमकं काय घडलं?
२०२१ च्या जून महिन्यात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे शिवसेनेकडे आणि पर्यायाने महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तर, दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाने त्यांच्याकडे असलेलं बहुमत सिद्ध केलं अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. राज्यात एकीकडे अशी उलथापालथ झालेली असताना शिवसेनेतील बंडाळीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली. पुरावे, बहुमत आणि इतर कायदेशीर प्रक्रियांनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मूळ शिवसेना म्हणून सिद्ध झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच पक्षाचं अधिकृत चिन्ह असलेलं धनुष्यबाणही मिळालं.