अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले..
मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीवर प्रहार केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमात अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमित शाह म्हणाले की, इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे.
हेही वाचा – चीनमधून आणलेल्या कागदावर छापल्या बनावट नोटा, ‘मास्टर माइंड’सह सहा जणांना अटक
इंडिया आघाडीकडे मी संत्र्याप्रमाणे पाहतो. संत्र हे फळ वरुन दिसताना एकत्र दिसतं त्याची साल काढली की आपसुक त्याच्या फोडी वेगळ्या होतात. २०२४ चा निकाल लागला की हे लोक पळून जातील. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल. राहुल गांधी आमचे नेते नसते तर आम्ही जिंकलो असतो असंही हे म्हणतील, अशी बोचरी टीका अमित शाह यांनी केली आहे.