“भाजपाच्या लग्नाला काँग्रेस-एमआयएमची वाजंत्री”, ठाकरे गटाचा खोचक टोला!

Ambadas Danve | अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने थेट काँग्रेस आणि ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सोबत हातमिळवणी केल्याचे चित्र समोर आले आहे. या अनपेक्षित युतीवर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
हिवरखेड नगरपरिषदेत भाजपाच्या उमेदवार अनिता वाकाडे यांच्या नामनिर्देशन अर्जात सूचक म्हणून काँग्रेसच्या नगरसेविका रुबिजा सलमान यांचे नाव आहे, तर अनुमोदक म्हणून एमआयएमचे नगरसेवक आजम खान यांचे नाव आहे. विरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा : ‘पुणे ग्रँड टूर’मध्ये चिमुकल्यांचाही जल्लोष!
या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे. “आश्चर्यच! हिवरखेडमध्ये ‘महायुती’ की ‘महाखिचडी’?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी या युतीकडे लक्ष वेधले. “हिवरखेड नगरपरिषदेत दुर्मिळ योग जुळून आलाय. भाजपच्या ‘लग्नाला’ काँग्रेस आणि एमआयएम वाजंत्री म्हणून हजर आहेत. ऑल द बेस्ट!” अशी पोस्ट उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी करत टीका केली आहे.
अकोट नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम युती, तसेच अंबरनाथमध्ये भाजपाची काँग्रेससोबत झालेली जवळीक यापूर्वीच चर्चेचा विषय ठरली होती. आता हिवरखेडमधील या नव्या राजकीय समीकरणामुळे भाजपाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या युतीमुळे स्थानिक पातळीवर राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.




