१५ दिवसांत आचारसंहिता लागेल; अजित पवारांचं विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान

Ajit Pawar | राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दौऱ्याला सुरूवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सोलापूर जिल्ह्यात पोहोचली आहे. मोहोळमध्ये भाषण करताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकांबाबत एक मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, १५ दिवसांत आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणूक असेल. पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे. तुमचं झाल्यानंतर माढ्याला जाऊन तिथेही हेच सांगणार आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी अजित पवारचा दौरा रद्द करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी फार स्पष्ट आहे.
हेही वाचा – ‘सरकार कुणाचंही असो आठवलेंच मंत्रिपद पक्क’; नितीन गडकरींची मिश्किल प्रतिक्रिया
यापुढे मोहोळकरांना कोणत्याही निधीची कमतरता भासू देणार नाही. सर्वांनी भरभरून पाठिंबा आणि आशीर्वाद दिले. मिळालेल्या पदाचा आणि संधीचा वापर करु. जनतेचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. आपण लोकांशी लबाडी करायची नाही, फसवायचं नाही. सरकारमध्ये काम करण्याकरता गेलो आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडीच वर्षे होतो, तेव्हा विचारधारा सोडली नाही. आपण सेक्युलर विचारधारा सोडली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना आवाहन आहे, कोणतीही जात धर्म एकमेकाचा आकस करत नाही. महाराष्ट्रात काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात, असं अजित पवार म्हणाले.
गरिबाला दीड हजाराची किंमत माहिती आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्याला काय माहिती आहे. धुणं भांडी करणारे, झोपडपट्टीत काम करणाऱ्यांना माहिती आहे. या योजनेला विरोध करणाऱ्यांना कोर्टानं धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर येतील तर ही योजना बंद करतील, असंही अजित पवार म्हणाले.





