‘लाठीचार्जचे आदेश दिल्याचं सिद्ध करा, राजकारण सोडेन’; अजित पवार यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
![Ajit Pawar said that he will quit politics if he proves that he ordered lathi charge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. जालन्यात झालेला लाठीहल्ला यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अजित पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.
अजित पवार म्हणाले, दोन दिवस आजारी होतो. त्यामुळे बाहेर पडता आलं नाही. त्यावरून अनेक समज-गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. जालन्यात जी घटना घडली, जो लाठीचार्ज झाला त्याबद्दल सगळ्यांनी त्याबाबतचा विरोध दर्शवला. असं व्हायला नको होतं. आमची सगळ्यांची तशीच भूमिका आहे. असे प्रसंग येतात तेव्हा सर्वांनी राज्याचं हित डोळ्यांसमोर घेऊन भूमिका घ्यायला हवी. पण दुर्दैवाने त्यात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा – जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
अनेकांना अनेक वेळा वेगवेगळ्या पदांवर संधी मिळाली. त्यांनी त्या त्या वेळी वेगवेगळ्या समाजघटकांना आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली. पण कायद्याच्या चौकटीतही तो प्रयत्न बसला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातही तो मान्य व्हायला हवा. सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे निर्णय देतं. त्याही वेळी तिथे अडचण येता कामा नये, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं. आहे का हिंमत? काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते हरू. पण उगीच शंका, गैरसमज निर्माण करायचे, समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून काही साध्य करता येतं का असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. तो महाराष्ट्राला परवडणारा नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी, असंही अजित पवार म्हणाले.