अपघातानंतर पोलीस आयुक्तांना फोन का केला? अजित पवार म्हणाले..
![Ajit Pawar said that he did not call the police commissioner after the accident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ajit-Pawar-780x470.jpg)
पुणे | पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. या प्रकरणात रोज अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात का गेले? आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणला का? अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला का? असे आरोप होत आहेत. या आरोपांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
अजित पवार म्हणाले की, राज्यात सर्वत्र त्या भागातील आमदार एखादी घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जात असतात. तो त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना योग्य चौकशी करण्याचा सूचना देतो. त्यानुसार आमदार सुनील टिंगरे गेले होते. त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. हे प्रकरण आता जनतेचे प्रकरण झाले आहे. या प्रकरणात चौकशी पारदर्शकपणे करा. कोणाच्या दबावास बळी पडू नका, इतक्याच सूचना आम्ही अधिकाऱ्यांना करत आहे.
हेही वाचा – Pune Porsche Car Accident : अल्पवयीन मुलाच्या आईला बेड्या, पोलीस आयुक्तांची माहिती
अपघातानंतर पोलीस आयुक्तांना आपण फोन केला नाही. या प्रकरणात फोन केला असता तरी जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा, अशाच सूचना आम्ही देत असतो, असं अजित पवार म्हणाले. डॉ. अजय तावरे यांची शिफारस मंत्री हसन मुश्रीफ आणि एनसीपी आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बदलीची शिफारस आम्ही करतो. परंतु ते नियमात आहे की नाही, हे बघण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. आमचे शिफारस पत्र असते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला पाहिजे, असंही ते म्हणाले.