अजित पवारांनी बारसू रिफायनरीबाबत स्पष्ट केली भूमिका; म्हणाले,..
खारघर घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी
मुंबई : कोकणातील बारसू येथे स्थानिक रिफायनरीला विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी त्यातील काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. या पर्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला जात असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही लोकांचा विरोध होता. पण चर्चा झाली त्यातून मार्ग निघाला. तशा प्रकारे या प्रकल्पाबाबत वेगवेगळं मत व्यक्त होत आहे. जे विरोध करत आहेत, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, कारण समजून घेतली, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. एन्तॉन प्रकल्प आणतानाही बऱ्याच जाणांनी विरोध केला होता. या प्रकरणी मुस्कटदाबी होऊ नये. संमतीने जे काही व्हायचं ते व्हावं. आम्ही विकासकामाला विरोध करत नाही.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी विनंती अजित पवार यांनी सरकारला केली आहे.