पुण्यातील घटनेनंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले..
मुंबई : पुण्यातील सदाशिव पेठेत काल भर दिवसा एका तरूणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. परंतु लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरूणांनी पीडितेला वाचवले. मात्र तेथील जमावाने बघ्याची भूमिका घेतल्याचं सीसीटीव्ही दृष्यात स्पष्ट दिसत आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.
हेही वाचा – Sangali: गरिबांना धान्य मिळेना: ‘रेशन’साठी आम आदमीचा आंदोलनाचा इशारा
https://twitter.com/RajThackeray/status/1673910828452675584
दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.