महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातानं ११ जणांचा मृत्यू; अजित पवारांनी सरकारला सुनावलं
मुंबई : मुंबईतल्या खारघरमध्ये काल (१६ एप्रिल) दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार पार पडला. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या धक्कादायक घटनेते तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच सुनावलं आहे.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार फार महत्वाचा आहे. पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महात्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किची लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की कोरोनाचा कोणताही आकडा लपवाचा नाही. जे घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आत्ता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डीवायपाटील, टाटा रूग्णालय अशा वेगवेगळ्या रूग्णालयात रूग्ण आहेत.
मुळात त्यांची वेळ चुकली. वेळ संध्याकाळची असती, तर अधिक योग्य झालं असतं. कारण संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी राहते. एप्रिल-मेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत. आप्पासाहेब धर्माधिकारींना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने लोक येतात. ती काळजी घ्यायला हवी होती, असं अजित पवार म्हणाले.
आधी जखमींवर उपचार आणि मृतांवर अंत्यसंस्कार या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. नंतर हे का घडलं, कोण जबाबदार आहे, कुणी हलगर्जीपणा दाखवलाय, कुणी दुर्लक्ष केलं आहे. कुणी वेळ निवडली आहे या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आम्हाला कुणालाच यात राजकारण करायचं नाही. कुणावरच असा प्रसंग येता कामा नये. पण तो सरकारी कार्यक्रम होता. स्वत: मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. साडेतेरा-चौदा कोटींचं बजेट त्या कार्यक्रमासाठी होतं. आजपर्यंत महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी एवढी रक्कम दिली गेली असं झालं नव्हतं. ती दिली गेली. त्यानंतर असं व्हायला नको होतं, असंही अजित पवार म्हणाले.