संजय राऊतांनी टोचले रणजित सावरकरांचे कान …तर हिंदुस्तानचा पाकिस्तान होण्यास वेळ लागला नसता
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यवीर सावरकरांनाविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावरकरांचे नातू रणजित सावरकरांचे कान टोचले आहेत. हा देश विज्ञानाच्या दिशेने नेण्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तर या देशाला विज्ञाननिष्ठेच्या दिशेने नेण्याचे काम पंडित नेहरूंनी केले आहे. नाहीतर या हिंदुस्तानचा पाकिस्तान होण्यास वेळ लागला नसता, म्हणत राऊतांनी रणजित सावरकरांवर निशाणा साधला आहे. राऊत आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.
आज एक धर्मांध राष्ट्र म्हणून पाकिस्तानची जी अवस्था आहे, जे काही पाकिस्तानात चालंल आहे, तसं भारतात नेहरूंनी होऊ दिलं नाही. याबद्दल देश नेहरूंचा ऋणी आहे, असही राऊत म्हणाले. कोणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केला म्हणून पंडित नेहरूंवर प्रश्न निर्माण करायचे हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. ही आपली परंपरा नाही, आम्ही सर्व सावकरांचे भक्त आहोत. त्यांच्यासाठी इथे लढाई वकिली करतो, अशा शब्दात राऊतांनी रणजीत सावकरांना खडेबोल सुनावले आहे.
स्वातंत्र्यसेनानी कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही एका विचारधारेचे नसतात. देश बनवण्यासाठी त्यांनी त्याग केला हे विसरून चालणार नाही. ते आता काय झालं, काय नाही हे स्पष्टीकरण देण्यासाठी जिवंत नाहीत, त्यांच्यावर अशाप्रकारे चिखलफेक करणे योग्य नाही, असही राऊत म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्याविषयी कोणी काही देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्य़ात प्रत्येकाचे स्थान आणि योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी बोलून लोकांच्या ज्ञात काही वेगळी भर पडणार नाही. असही राऊत म्हणाले.
सावकरांवर सुरु असलेल्या वादावर अनेक चर्चा झाल्या. आमच्यासाठी सावरकर वंदनीय आणि प्रिय आहे. ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्याग केला, बलिदान दिले, त्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आणि आस्था असल्याची भावना राऊतांनी व्यक्त केली.