‘वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
मुंबई | “माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोव्हिडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत आहोत. त्याचा परिणाम म्हणून येणाऱ्या काळात मृत्यूदर आणि कोरोना संसर्गाचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारुन ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. कोव्हिडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत.” या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभाग झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरुन परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करुन कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत राज्य सरकार करत असलेल्या काही महत्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव्य घेतले जातात. रॅपिड एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली, तर दुसरा घेतलेला द्राव्य आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवला जातो. औषधांची उपलब्धता ठेवली आहे. दररोज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.