मुंबई, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे कोणीही असो, आमच्यातलेही का असेना, माफी मागावीच लागेल: खासदार संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Du3.jpg)
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत प्रकरणावर पुन्हा एकदा रोखठोक भूमिका घेतली आहे. कंगना रनौतविषयी अशा भाषेचा उपयोग योग्य आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अभद्र भाषेचा उपयोग करणारा कुणीही असो माफी मागावीच लागेल, असं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. संजय राऊत म्हणाले, “मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल येथे राहणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाबद्दल अशाप्रकारे अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्यांना महाराष्ट्राची आणि मुंबईची माफी मागावीच लागेलच. ते आमच्यापैकी कुणी असेल तरीही त्याला मी माफी मागायला सांगेल.”
याआधी संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतशी व्यक्तिगत भांडण नाही. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो आम्ही आवाज उठवू, अशी भूमिका घेतलेली होती. यावेळी त्यांनी कंगनाला मराठी वाचता बोलता येतं का? असा प्रश्नही विचारलेला होता. तसेच इतरांच्या ट्वीटचे अर्थ कळण्यासाठी स्वतःचं ट्वीटर खातं स्वतः वापरावं लागतं, दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे द्यायचं नसतं, असा टोलाही लगावला आहे. संजय राऊत म्हणाले होते, “हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रनौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. पण महाराष्ट्राच अपमान करणारा कुणीही, कितीही मोठा असो खपवून घेणार नाही. भाजपचे नेते आशिष शेलार यांचीही भूमिकाही मी वाचली त्यांनी हे अधिक जोराने म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात.”