माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट; राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
मुंबई: काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टुन शेअर केल्याने काही शिव सैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. आता या प्रकरणावरून राजकारण तापत असताना आज मदन शर्मा राजभवनावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहचले होते. दरम्यान या भेटीनंतर बाहेर पडल्यावर कोश्यारी यांच्याकडे राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी केल्याचं मदन शर्मा यांनी सांगितलेलं आहे.
तसेच आरोपींवर लावण्यात आलेले गुन्हे देखील कमी सौम्यतेचे आहेत. ही बाब राष्ट्रपतींच्या कानावर घातलेली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मदन शर्मा यांच्यामध्ये झालेल्या बातचितीनंतर या प्रकरणी राज्यपाल केंद्राशी बोलणार असल्याचं देखील त्यांनी सांगितल्याची माहिती दिलेली आहे. यासोबतच शिवसैनिकांनी जेव्हा मारहाण केलेली तेव्हा त्यांनी माझे संबंध भाजपा आणि आरएसएस सोबत जोडलेले होते. मात्र आता मीच सांगतो की मी आता भारतीय जनता पक्ष आणि आरएसएससोबत आहे. काल मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी जामीनावर सुटलेल्या 6 आरोपींना पुन्हा अटक झालेली आहे. समता नगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कलम 452 वाढवण्यात आलेले आहे. आज या आरोपींना कोर्टात दाखल केलेले आहे. 6 आरोपींना बोरिवली कोर्टाने आज न्यायालयीन कोठडी ठोठावलेली आहे.