‘निवडणुका आल्या की लगेच खात्यात पैसे जमा करण्याचा मोदींचा धंदा’- नवाब मलिक
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकार आज सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. निवडणुका आल्या किंवा भाजपा अडचणीत आली की शेतकर्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा करण्याचा धंदा पंतप्रधान मोदींनी सुरू केल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेली आहे.
सहा हजार रुपये शेतकर्यांना देता आणि त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवता… हे नक्की काय चाललंय? शेतकर्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या संवादाला भाजपाचेच कार्यकर्ते बसलेले दिसतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोटा प्रचारही करण्याचा प्रयत्न करतील, अशी टीका मलिक यांनी केलेली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून देखील मलिक यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांना देशातील शेतकर्यांचा विरोध आहे. इतक्या दिवसांनंतर याबाबत देशातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा नवा उपक्रम भाजपने सुरू केला आहे. पण विश्वासघाताचं राजकारण करणार्या भाजपने आधी स्वत:ची विश्वासार्हता दाखवावी, अशी टीका त्यांनी केली आहे.
वाचा- औरंगाबाद महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून मुंडेंच्या जागी संपर्कप्रमुख म्हणून ‘या’ नेत्याची नियुक्ती