…खेळ तर आता सुरू झाला आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्नब गोस्वामींचे आव्हान
मुंबई । प्रतिनिधी
अलिबागमधील वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची तळोजा कारागृहातून बुधवारी सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येताच अर्णब यांनी “उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अर्णब गोस्वामी यांना दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला. अर्णब यांच्यासोबत अन्य दोन आरोपींचीही प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचकल्यावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सुटका झाल्यानंतर अर्णब यांनी आपल्या न्यूज रूममध्ये जात म्हटलं की, “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे. आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक वाहिनी सुरू करणार असून, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती आहे. मी तुरुंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असेही त्यांनी आक्रमक होत म्हटल. तद्वत, अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.
दरम्यान, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे अर्णब गोस्वामी प्रकरणी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अर्णब यांच्या अटकेवरून प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य व्यक्त केले. त्यासोबतच उच्च न्यायालयाकडून अर्णब यांना जामीन नाकारताना चूक झाल्याची टिप्पणी केली. एफआयआर प्रलंबित असेल आणि तरीही जामिनासाठी नकार दिला असेल तर हा न्यायाचा उपहास ठरेल, असेही मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी व्यक्त केले.