‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’; डॉ. सदानंद मोरे
श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनकडून कर्तुत्व संपन्न व्यक्ती, संस्थांचा गौरव
पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, अभिनेते अशोक समर्थ यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी, रामकृष्ण मोरे यांनी शहरातील अनेकांना घडवले. पण त्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्याचे काम फक्त श्रीरंग आप्पांनीच केलं, अशा भावना सदानंद मोरे यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, शिवाजी महाराज जिथे घडले त्या भागातले आपण आहोत, याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. इथल्या लोकांना जो संसदेत मांडतो तो खरोखर महान असतो. प्रभू श्रीरामांचा पहिला राज्याभिषेक महाराष्ट्रात झाला. नाशिकच्या परिसरात असताना सीता मातेचे अपहरण झाले. रावणाचा वध करण्यासाठी श्रीराम लंकेकडे गेले. ही माहिती भरताला समजली आणि तो सर्व सैन्य घेऊन लंकेकडे निघाला. पण तो महाराष्ट्रात आला तेंव्हा श्रीराम सीता मातेला घेऊन परत आले होते. त्यावेळी तिथे प्रभू श्रीरामांचा पहिला अभिषेक झाला.
सातवाहन राजांचे मूळचे मावळ येथील आहेत. ते पुढे जुन्नर आणि त्यानंतर पैठणला गेले. सातवाहन राजे मूळचे मावळचे असल्याने त्यांचे या भागात स्मारक झाले पाहिजे. तो इतिहास आपण पुढे आणला पाहिजे. प्राकृत मराठी भाषेचे पुढचे स्वरूप हे आताची मराठी भाषा आहे. हे शासनाने लक्षात घेतल्यास मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असं सदानंद मोरे म्हणाले.
हेही वाचा – ‘..तर मी उद्धव ठाकरेंच्या घरी भांडी घासेन’; शिंदे गटातील नेत्याचं विधान
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डॉ. रामकृष्ण मोरे यांच्यामुळे झाली. कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा असावा तर तो रामकृष्ण मोरे यांच्यासारखा असावा. केवळ हव्यासापोटी राजकारणात आलो तर आपण चिरकाल टिकू शकणार नाही, हे बाळकडू त्यांनी मला दिले. मी २२ वर्ष महापालिकेत काम केले. स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, गटनेता म्हणून काम केले. तिथे माझ्या राजकीय कारकिर्दीची चांगली पायाभरणी झाली. जनतेच्या आशीर्वाद आणि प्रेमाच्या जोरावर मी आज संसदेत चांगल्या प्रकारे काम करू शकत आहे.
माझ्या प्रामाणिकपणे काम करण्यामुळे जनतेने मला स्वीकारले. अनेक वर्ष काम करत असताना आपण ज्या समाजात राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो. हा आशय घेऊन फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक चांगल्या लोकांना पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. राजकीय जोडे बाजूला ठेऊन अनेकजण चांगल्या कामांसाठी एकत्र येत आहेत हेच माझ्या यशाचे गमक आहे. शहरे वाढत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम ठिकाणी अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यासाठी देखील मला आजवर भरपूर काम करता आलं याचा आनंद वाटतो, असेही खासदार श्रीरंग बारणे म्हणाले.
‘या’ आदर्श व्यक्ती, संस्थांचा झाला सन्मान
शिक्षणरत्न पुरस्काराने धनंजय वर्णेकर, वारकरी भूषण पुरस्काराने ह.भ.प जालंधर महाराज काळोखे, आरोग्य भूषण पुरस्काराने डॉ. अविनाश वाचासुंदर, उद्योगरत्न पुरस्काराने राकेश सोनिगरा, योग भूषण पुरस्काराने वैशाली देशमाने, पर्यावरण भूषण पुरस्काराने डॉ. अजित जगताप, शिक्षणरत्न पुरस्काराने आरती भेगडे, शिक्षणरत्न पुरस्काराने नीता मोहिते, कृषीरत्न पुरस्काराने खंडू भोंडवे, समाज भूषण पुरस्काराने सुर्यकांत ताम्हाणे, क्रीडारत्न पुरस्काराने खुशी मुल्ला, समाज भूषण पुरस्काराने रामदास माळी, बसवराज कनजे, दुर्गरत्न पुरस्काराने शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अॅण्ड अॅडव्हेचर क्लब, आदर्श कामगार युनियन एसकेएफ कामगार युनियन, समाजसेवा भूषण पुरस्काराने सातारा मित्र मंडळ, आदर्श सोसायटी पुरस्काराने गणेशम २ सोसायटी, रामतीर्थ हौसिंग सोसायटी, रिचमंड सोसायटीचा सन्मान करण्यात आला.