पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘जल्लोष शिक्षणाचा’… पण, हद्दीबाहेर!
महत्त्वपूर्ण उपक्रमाचे यश शहराबाहेर साजरे करण्याची नामुष्की
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Shikshanacha-Jallosh-780x470.jpg)
-
बालेवाडी क्रिडा संकुलाच्या धर्तीवर ‘स्मार्ट सिटी’त सुविधा नाही
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिका शाळा आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश साजरे करण्यासाठी प्रशासनाला शहराबाहेरचे स्थळ निश्चित करावे लागले. बालेवाडी येथील क्रीडा संकुलावर हा कार्यक्रम झाला, पण स्मार्ट सिटी असलेल्या शहरात अशी सुविधा प्रशासन का निर्माण करु शकले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरात नाट्यगृह, प्रेक्षागृह आणि सभागृह आहेत. त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. क्रीडांगणे आहेत. त्या ठिकाणीही हा कार्यक्रम घेता आला असता पण महापालिका प्रशासनाने बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये हा कार्यक्रम नियोजित केला.
शहरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण होता. महापालिका शाळांमध्ये झालेले वैविध्यपूर्ण बदल, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध महत्वाकांक्षी उपक्रम आणि आदर्श शिक्षक यामुळे महापालिका शाळांचे चित्र पूर्णपणे बदलले आहे, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. ही बाब शहरातील नागरिकांना समजणे अपेक्षीत होते. त्यामुळे शहरात हा कार्यक्रम होणे क्रमप्राप्त होते. परंतु, तसे झाले नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात बालेवाडी येथील क्रीडा संकुलाच्या धर्तीवर क्रीडा संकूल आणि बहुउद्देशीय मैदान व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पिंपरी-चिंचवडकर नागरिकांना त्यापासून वंचित रहावे लागत आहे. शिक्षणाचा जल्लोष… करीत असतानाच प्रशासनाने शहरात त्या-त्या सुविधा दिल्या पाहिजेत, अशी खंत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहराची वाटचाल परावलंबी…
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने बालेवाडी येथील क्रीडा संकुलाप्रमाणे शहरात एकही पर्याय नाही. मध्यंतरी मोशी येथील प्रस्तावित बहुउद्देशीय क्रीडा संकूल व क्रिकेट स्टेडिअम तसेच, कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअम या सारखे प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता महायुती सरकारच्या काळात परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती मात्र, ‘‘ये रे माझ्या मागल्या…’’ या उक्तीप्रमाणे पिंपरी-चिंवचड महापालिका प्रशासनाची वाटचाल परावलंबी धोरण धार्जिणी होवू लागली आहे, असे चित्र आहे.