पिंपरी-चिंचवड: गुणवंत विद्यार्थी हे विकसित भारताच्या प्रक्रियेतील जबाबदार घटक!
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची भावना : सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार
![Pimpri-Chinchwad: Meritorious students are responsible factors in the process of developed India!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Shankar-Jagatap-2-780x470.jpg)
पिंपरी : सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे काम प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक करीत असतात. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या शिक्षक, मुख्याध्यापकांचा आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांचा उचित गौरव सचिन साठे सोशल फाउंडेशन सलग १९ वर्षे करीत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थी असताना कौतुकाची थाप पाठीवर पडल्याने घडण्याच्या या वयात पुढील जबाबदारीची जाणीव देखील होते. हे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या प्रक्रियेतील जबाबदार घटक असतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार समारंभ १५ ऑगस्ट चे औचित्य साधून पिंपळे निलख येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, संयोजक सचिन साठे, प्रसिद्ध अभिनेते ”देव माणूस’ फेम किरण गायकवाड यांच्या हस्ते सत्कारमूर्ती पै. दत्तोबा प्रभूजी थोपटे, विश्वासराव जपे काका, राजेश आगळे, अशोक अकुल, बबन येडे, मधुकर जगताप, महादेव इंगवले, संजय जैन, रोशन ताथेड, डॉ. प्रदीप पाटील, मुख्याध्यापिका संगीता टिळेकर, युवराज दुबळे, विश्वजीत कोंडे, प्रसाद घुंबरे पाटील, प्रशांत कांबळे आणि पिंपळे निलख मधील आरोग्य विभागाचे कर्मचारी व १० वी, १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसाद गोकुळे, भुलेश्वर नांदगुडे, काळूशेठ नांदगुडे, नितीन इंगवले, विजय जगताप, गणेश कस्पटे, भारत इंगवले अनंत कुंभार, अनिल संचेती आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, स्मार्टवॉच, स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला. तसेच सत्कारमूर्तींचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत प्रास्ताविक करताना सचिन साठे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचे ध्येय ठेवावे. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक अशी ध्येय ठेवून सकारात्मक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल. हे सर्व करत असताना सुसंस्कृत आणि चांगला माणूस म्हणून घडणे देखील गरजेचे आहे. सुसंस्कृत चांगला माणूस समाजासाठी आणि कुटुंबासाठी आवश्यक आहे. शिक्षणाने बुद्धी वाढते तसेच संस्काराने व्यक्तिमत्व घडते. उत्कृष्ट व्यक्तिमत्व हेच जीवनातील ध्येय असावे असेही सचिन साठे यांनी सांगितले.