पुण्यात शिक्षण संचालकांच्या कार्यालयात पालकांचा ठिय्या!
गणवेश व पाठयपुस्तके न मिळाल्याने पालक संतप्त

पुणे | प्रतिनिधी
आरटीईच्या विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र यांच्या कार्यालयात शासन व सिम्बॉयसिस शाळेच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क २००९ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना गणवेश व पाठयपुस्तके देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकांसमवेत ११० विद्यार्थ्यांनी “शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”आठवीनंतर आमचं भविष्य काय” अशा घोषणा देऊन संचालक कार्यालय परिसर दणाणून सोडला.
केंद्र शासनाच्या शिक्षण हक्क २००९ कायद्यानुसार आर्थिक दुर्लभ व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. या कायद्यानुसार संबंधित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. मात्र बड्या व महागड्या शाळेमध्ये महागडे गणवेश व पाठयपुस्तके घेण्यासाठी शाळेकडून पालकांवर दबाव केला जातोय. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर होताना दिसून येतोय. आरटीई कायद्यानुसार कलम १२ (१) (C) खासगी व विनाअनुदानित शाळांना मोफत गणवेश व पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना पुरवणे अनिवार्य आहे.
मात्र कायद्याची पायमल्ली करत विदयार्थ्यांना गणवेश व पाठयपुस्तके मागील वर्षांपासून दिले नाहीत. यामुळे गेल्या दिड वर्षांपासून हे पालक शिक्षण विभागाच्या पायऱ्या झिजवत आहेत. आरटीई अंतर्गत ८ वी पर्यंत प्राथमिक शिक्षण दिले जाते. ह्या शाळेचे ८ वी नंतर दुसऱ्या शाळेत मुलांना शिक्षण पूर्णपणे वेगळे असते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होईल. यामुळे त्याची मर्यादा १२ पर्यंत करण्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी पालकांनी केली.
हेही वाचा – राज्यपाल रमेश बैस डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहणार
शिक्षण संचालकांनी गणवेश व पाठपुस्तके देण्यास शाळेस पत्र दिले आहे. तरीही शाळेकडून मुजोरी करून गणवेश व पाठपुस्तके देणार नाही असे सांगितले जात आहे. शाळा संचालकांच्या पत्रालाही केराची टोपली दाखवली जात आहे. शाळा जर संचालकांचे ऐकत नसेल तर न्याय मागायचा कुणाकडे ?
विनोद डोळस, पालक.
आपल्या पाल्याला चांगल्या व मोठ्या शाळेत 12 वी पर्यंत शिकवता येईल, या उद्देशाने आरटीई अंतर्गत प्रवेश घेतला. परंतु आता अनुभव खूप विचित्र येत आहे. आता केवळ आठवी पर्यंत मोफत शिक्षण देणार . नंतर 9 वी ला शाळेची फी 5 लाख एवढी आहे. ती भरायची कुठून आणि शाळा बदलली तर दुसऱ्या शाळेचे शिक्षण हे पूर्ण वेगळे आहे. तर मुलाच्या भविष्याच काय असा प्रश्न पडतोय.
नितीन खंडागळे, पालक.





