मेट्रो मार्गावर संतांचे म्युरल्स बसवा; शहरात वारकऱ्यांना निवासाची व्यवस्था करा
-महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या मागण्या
-आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन
मोशी | पिंपरी-चिंचवड शहरातून मेट्रो धावणाऱ्या मार्गावर संत परंपरेतील महान संतांची तैलचित्रे म्युरल्स बसवण्यात यावी तसेच या मेट्रो मार्गाला तपोनिधी श्री नारायण महाराज यांचे नाव द्यावे आणि भविष्यातील गरज ओळखून आळंदी-देहू यासारख्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या समस्त वैष्णवी जनांसाठी निवासाची व्यवस्था करावी अशी मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाने केली असून, याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. तसेच शहराला लाभलेले धार्मिक अनुष्ठान लक्षात घेऊन इतरही काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विजय जगताप व सचिव जयंत बागल यांनी याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी पालखी सोहळा प्रमुख भानुदास मोरे, कीर्तनकार सतिश महाराज काळजे, वारकरी मंडळाचे जीवन मामा खानेकर, प्रवचनकार खंडु बापू मोरे, विजय जगताप, चिंचवड देस्थान विश्वस्त आनंद तांबे, नितीन महाराज मोरे, संपर्कप्रमुख संजय भिसे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिष बारणे, संघटक आनंदा कापसे, जालिंदर काळोखे,किशोर पाटील, कैलास कातळे, सचिन ढोरे, माऊली आढाव, विजुभाऊ गायकवाड आदी उपस्थित होते.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, पिंपरी-चिंचवड शहर श्री. संत ज्ञानेश्वर,
श्री. संत तुकाराम महाराज, महासाधु श्री मोरया गोसावी यांच्या यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहे. या शहरात या तीनही महान संतांच्या पालख्यांचे स्वागत नागरिक करीत असतात. पिंपरी चिंचवड शहरातून या पालख्या पुढील मार्गक्रमण करीत असताना शहरात यांच्यासाठी समर्पित भावना ठेवून काही गोष्टी करणे आवश्यक आहे. असे महाराष्ट्र वारकरी महामंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तसेच नियोजित मेट्रो मार्गीकेच्या सर्व पिलरवर संताचे म्युरल, चित्र आणि अभंग लावणे याला लाईट इफेक्टची जोड मिळावी. मेट्रो मार्गाला (निगडी, दापोडी, पुणे मेट्रो महामार्ग) पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी श्री नारायण महाराज तर सद्गुगुरू श्री हैबतराव बाबा आरफळकर (- भोसरी, कासारवाडी, मोशी मेट्रो महामार्ग) सेतु असे नामकरण करण्यात यावे, निगडी आणि दापोडी, थोरल्या पादुका चऱ्होली, मोशी,देहू फाटा,दिघी, येथे पालख्यांचे स्वागत कमान नामफलक म्हणून कायमस्वरूपी उभारण्यात यावी. यांसारख्या मागण्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी वारकऱ्यांनी आयुक्त राजेश पाटील यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन जयंत अप्पा बागलयांनी केले. आभार उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी मानले.





