राजकीय गदारोळात मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होतेय : विरोधी पक्षनेते अजित पवार
![Basic questions are being ignored in political uproar: Leader of Opposition Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/ajit-pawar-pcmc.jpeg)
पिंपरी : राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पराकोटीला गेले आहेत. दोघांनीही दसरा मेळाव्यात सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत या राजकीय गदारोळात महागाई आणि बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न बाजूला पडत आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाईने जनता होरपळत असून इंधन, सीएनजीच्या नुकतेच झालेल्या दरावाढीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष्य वेधले.
पवार आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. थेरगाव येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.(Ajit Pawar) मुंबईत रात्री होणार असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाब विचारले असता पवार म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यावी. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा , आपली भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. पण, लोकशाहित काही परंपरा असतात, त्या जपाव्यात. कोणाचाही अनादर करू नये. महाराष्ट्राच्या परंपरेला बाधा येणार नाही, डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही अशा पद्धतीने वागावे.
ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वाद मिटतील का? असे विचारले असता पवार म्हणाले, दोघांतील वाद पराकोटीला गेले आहेत. त्यात पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न असून शब्दाने शब्द वाढत जातो. जसे दिवस पुढे जातील तशी कटुता कमी होईल. जनतेसमोर जातील. आता मुंबईतील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणूक निकालावर लक्ष असेल.
सर्वसामान्यांना गॅस मिळणे मुश्किल…
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार की गोठवणार का? गोठवले तर दोघे दुसरे कोणते चिन्ह घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील या घडामोडींमुळे महाराष्ट्र अस्थिर होणार नाही. पण, सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या वाढत्या महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष होत आहे. महागाईने जनता होरपळत आहे. आता वर्षाला 15 घरगुती गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. पण, त्याच्या अटी शर्ती अतिशय जाचक आहेत. 15 गॅस मिळणे मुश्कील होणार आहे, असेही ते म्हणाले.