सार्वजनिक ठिकाणी आता कृत्रिम सावलीची नामुष्की

पिंपरी : उन्हाचा चटका कितीही वाढला तरी कृत्रिम सावलीची गरज कधी पडली नव्हती, कारण सार्वजनिक ठिकाणी पुरेसी झाडांची सावली होती. मात्र वाढते शहरीकरण व विकासाच्या नावाखाली शहरातील वृक्षसंपदा नामशेष होत चालली आहे. वृक्ष संवर्धन करणारी यंत्रणाच वृक्षांच्या मुळावर उठली असल्याने उष्णतेची तिव्रता वाढली आहे. रस्त्यालगतची झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी कृत्रिम सावली करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्णतेच्या लाटेसंदर्भात तशा मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
त्याअनुषंगाने राज्य शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी संबंधित प्रशासकीय विभाग, महापालिका, नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास उष्णतेच्या लाटांमुळे सार्वजनिक आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन, जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महापालिकेने या सूचनांना केराची टोपली दाखवली आहे. त्या सूचनेतील कोणत्याच उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा – ‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
काय आहेत मार्गदर्शक सूचना
– बाजार, प्रमुख कार्यालये, बस स्टॅण्ड, टॅक्सी स्टॅण्ड, रिक्षा स्टॅण्ड इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पुरेशी सावलीची व्यवस्था करावी. तसेच याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी (पंखा/कुलर इ. नादुरुस्त असल्यास दुरुस्त करावे)
– सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या लाटेशी संबंधित घ्यावयाची काळजी, संदर्भात पोस्टर्स/बॅनर्स लावावेत.
– उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्रथमोपचार पेट्या ठेवाव्यात आणि त्याच्या वापराबाबत आवश्यक सूचना लिहाव्यात.
– टॅक्सी स्टॅण्ड, बस स्टॅण्ड (सरकारी/खाजगी), बाजार क्षेत्र आणि सरकारी कार्यालये या सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करावे.
– महापालिका आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शॉपिंग मॉल्समध्ये ग्राहकांसाठी आणि बाहेरील लोकांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी. तसेच बाहेरील लोकांना पाण्याच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यासाठी मार्गदर्शक फलक ठेवावे.
– उपलब्ध असल्यास रस्त्यावर पाणी शिंपडावे.
– सर्व उद्याने दुपारी १२ ते दुपारी ४ वेळेत खुली ठेवावीत.
आरोग्य विभागाला या सूचना
उष्णतेच्या लाटेशी संबंधित आजार निरीक्षण आणि अहवाल तयार करणेसाठी नोडल अधिकारी नियुक्त करावे. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्या संबंधित माहिती फलक लावावेत.