स्थायी समिती सदस्य पदासाठी जोरदार फिल्डिंग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/pcmc-02.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत येत्या २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. येत्या २० फेब्रुवारीला होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यामध्ये पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे (भाजप) १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचे एक आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक १० सदस्य समितीत आहेत. यातील गेल्या वर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष सदस्य साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे या पदावर नवीन सभासदांची नियुक्ती केली जाणार आहे. पालिकेत निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षी निम्मे सदस्य चिठ्ठीद्वारे स्थायी समितीमधून बाहेर पडतात. गेल्या वर्षी चिठ्ठीतून बाहेर पडलेल्या सदस्यांची जागी भाजपने शीतल शिंदे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, राहुल जाधव, नम्रता लोंढे, विलास मडिगेरी यांना संधी दिली होती. शीतल शिंदे आणि राहुल जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचे राजीनामे दिले. त्यामुळे भाजपने त्यांच्या जागी राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची निवड केली होती.
समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर चिठ्ठीत नाव न आलेल्या लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, अपक्ष कैलास बारणे, निर्मला कुटे या सभासदांचे राजीनामे भाजपने घेतले. त्यांच्या जागी पक्षाने सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस आणि अपक्ष साधना मळेकर यांना स्थायी समितीमध्ये नियुक्ती केली होती. राजीनामा दिलेल्या सदस्यांची जागी नियुक्ती झाल्यामुळे या सदस्यांना नियमाप्रमाणे संबधित सभासदांचा उर्वरित एक वर्षाचा कालावधीच मिळतो. त्यामुळे त्यांचाही दोन वर्षाचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपत आहे. तर, चिठ्ठीतून बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी स्थायीत नियुक्ती झालेल्या भाजपच्या सागर आंगोळकर, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, विलास मडिगेरी यांच्यासह राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांचा आणखीन एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. समितीमधील सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आगामी काळ निवडणुकीचा असल्याने भाजपकडून स्थायी समितीत सदस्य निवडताना गटा-तटाचा समतोल कसा साधला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, गेल्या वर्षी स्थायी समितीच्या सदस्यांनी निवड झाल्यानंतर लगेचच राजीनामा सत्र सुरु केले होते. शीतल शिंदे, राहुल जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचे राजीनामे दिले होते. या समितीमध्ये आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेक सभासदांनी वशिला लावण्यास सुरूवात केली आहे.
सर्व सदस्यांचे राजीनामे?
पालिकेत सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दर वर्षी दहा आणि अपक्ष एक अशी ५५ नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा ११ सदस्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. त्यामुळे या वेळी सर्वच सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्थायी समितीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आणि शिवसेनेच्या एका सदस्याची स्थायीत वर्णी लागणार आहे.