विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून कालवधी वाढवा
![Increase the duration by increasing the student scholarship](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/रयत.png)
रयत विद्यार्थी विचार मंचचे समाज कल्याण आयुक्तांना निवेदन
पुणे | प्रतिनिधी
पुण्यात अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती विविध कारणासाठी अपात्र ठरविल्या आहेत. त्यांच्या त्रुटी दूर करून त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे समाज कल्याण आयुक्तांना या बाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याची मागणी निवेदनात त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, नुकतेच समाजकल्याण विभागातर्फे २६० महाविद्यालयांना शिष्यवृत्ती देण्यासाठी विलंब केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते चुकीचे असणे, आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट नसणे, बँक खात्यास आधार कार्ड संलग्नित नसणे, बँक खाते निष्क्रिय असणे, उत्पन्न दाखला जातीचा दाखला अशा त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस देऊन महाविद्यालयांना मुदतवाढ दिली आहे. परंतु हि मुदतवाढ पुरेशी नाही. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये विलंब केला जातो. तासनतास रांगेत उभा राहावे लागते. कागदपत्राअभावी विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत. एजंट काढून त्यांची आर्थिक लूट होते.
यामध्ये विद्यार्थ्यांची खूप धावपळ होते. त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती हि खूप अल्प प्रमाणात मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून व शिष्यवृत्तीसाठी असणारी उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करून विद्यार्थ्यांना शाळेच्या दाखल्यावरती शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा. तसेच शिष्यवृत्तीच्या कालावधीला मुदतवाढ मिळावी. संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या त्रुटी सोडवाव्या व उत्पन्न दाखले १ ते २ दिवसात विद्यार्थ्यांना कसे उपलब्ध होतील, यासंदर्भात सूचना द्याव्यात, अश्या आशयाचे निवदेन समाज कल्याण आयुक्त पुणे महाराष्ट्र राज्य यांना रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने देण्यात आले.