लठ्ठपणामुळे विवाहिता आत्महत्तेस प्रवृत्त, सासरच्या आरोपींना गजाआड करा – आ. डॉ. नीलम गो-हे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Nilam-Gorhe.jpg)
पुणे, (महाईन्यूज) – भोसरी पोलीस स्टेशन येथे नोंद असलेल्या एफआयआर नं ५४२/२०१९ नुसार लठ्ठ असल्याने घरात होत असलेल्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. निष्पाप विवाहितेला किरकोळ कारणावरून आत्महत्तेस प्रवृत्त करणा-या आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
प्रियांका केदार पेटकर या विवाहितेने लठ्ठ असल्यामुळे सासरकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून शनिवारी (दि. २५) आत्महत्या केली. चार वर्षांपूर्वी केदार पेटकर याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींकडून प्रियांकाला तू लठ्ठ आहेस, घटस्फोट घे, माहेरातून पैसे घेऊन ये, अशा पद्धतीने त्रास दिला जात असे, याच त्रासाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केली आहे, अशी प्रियंका हिचा भाऊ पुष्कराज प्रभुणे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यासंदर्भात भोसरी पोलिसांनी पती केदार पेटकर आणि त्याच्या आई-वडिलांसह अन्य एकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६, ४९८ अ, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याबाबत शिवसेना प्रवक्त्या गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त-पिंपरी चिंचवड यांना निवेदनाच्या माध्यमातून पुढील मागण्या केल्या आहेत. या घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. या आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे प्रियांका हिच्या भावाचे म्हणणे असल्याने आयपीसी कलम ३०२ लावता येईल का? याचा विचार करण्यात यावा, याबाबत गोऱ्हे यांनी सूचना केल्या आहे. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी समाजात प्रबोधनाची आवश्यकता आहे त्यासाठी उपाययोजना करण्यात यावेत, अशा मागण्या या निवेदनाद्वारे आ.डॉ.गोऱ्हे यांनी केल्या आहेत.
नायर हॉस्पिटल डॉ. पायल तडवी आत्महत्या घटनेचा तपास मुंबई पोलीस उपायुक्त क्राईम यांच्याकडे सोपविण्यात यावा, यासाठी गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच, आरोपीं जोपर्यंत आत्महत्या की हत्या हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात यावी, अशी देखील मागणी केली आहे. मेडिकल रिपोर्ट बाबत सेकंड ओपिनियन म्हणून फॉरेन्सिक तज्ञ, निपक्ष आणि अभ्यासू डॉक्टर यांचे ओपिनियन घेण्याबाबत देखील गो-हे यांनी विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.