मोदी, शहांच्या धार्मिक तेढ निर्माण करणा-या विधानांमुळेच दिल्लीत जाळपोळ – शरद पवार
मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम
‘दिल्लीत हवं ते मिळालं नाही, त्यामुळेच दिल्लीत आग लावली जात आहे. दिल्ली विधानसभा प्रचारामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांसह अनेक मंत्र्यांनी वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण होईल असेच विधानं केली. दिल्लीमध्ये सुरू असलेली जाळपोळ याला संपूर्ण केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिराचा समारोप करताना भाषणात शरद पवार यांनी केंद्र सरकार दिल्लीतील दंगल मुद्दामून करत असून वातावरण खराब करत असल्याचं म्हटलं आहे. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येत असताना एका विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे की काय? विशिष्ट धर्माच्या लोकांच्या शाळेत घुसून शालेय शिक्षण संस्थांचं नुकसान केले जात आहे,’ अशीही टीका पवारांनी केली.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली निवडणुकीवेळी देशाच्या सामाजिक ऐक्याला धक्का लावणारा प्रचार केला. अशा व्यक्तींकडून हा प्रचार केला गेल्याने मलाही धक्का बसला. दिल्लीत अशी स्थिती निर्माण होण्याच्या पाठीमागे कोण आहे, याची चौकशी करण्याची गरज नाही. सर्वांना माहिती कोण आहे,’ असाही आरोप राष्ट्रवादीच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना पवार यांनी भाजपवर केला.