breaking-newsपिंपरी / चिंचवड

मलई नसल्यामुळेच सत्ताधारी व प्रशासनाकडून गणेशोत्सवाचा अवमान – प्रशांत शितोळे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना काळामध्ये धार्मिक उत्सव साजरे करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे महापालिका प्रशासनाने डोळेझाक केली आहे. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांना याचे कसलेही गांभिर्य असल्याचे दिसत नाही. यात कसलीही मलई दिसत नसल्यामुळे सत्ताधा-यांकडून गणेशोत्सवाचा अवमान केला जात असल्याची टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली आहे.

महत्त्वाचा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा होत असतो. कोरोना कालावधीतील हा उत्सव चांगल्या  पद्धतीने करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलून उपायोजना केल्या पाहिजे होत्या. परंतु, त्या केलेल्या दिसत नाहीत. पुणे महापालिकेने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना व विसर्जन, गौरी गणपती यांचे चांगले नियोजन केले आहे. दोन्ही महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असूनही केवळ आपल्या शहरात मलई खाण्याची कामे मनापासून केली जात आहेत.

पुणे पालिका प्रत्येक घरात पोटॅशियम कार्बोनेटची पावडर देत असून २० लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो पोटॅशियम कार्बोनेट टाकल्यास सर्व प्रकारच्या मूर्तींचे विघटन होते. दोन दिवसात त्याचा पुन्हा उपयोग होऊ शकतो. यासाठी घरटी विसर्जन व्हावे, म्हणून व नदीघाटावर गणपती विसर्जन होणार नाही. याची खबरदारी म्हणून नियोजन केले आहे. तसेच, गल्ली बोळांमध्ये फिरते पाण्याचे हौद येणार असून याद्वारे श्री गणपती मूर्तींचे संकलन, तसेच शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन याचे नियोजन असल्याचे समजते.

पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारच्या सुज्ञ कल्पनांची वानवा असून सत्ताधारी पक्षाचे नागरिकांना अशा प्रकारची सुविधा व सेवा देण्याची अजिबात इच्छा नाही, हेच यातून सिद्ध होते, असा आरोप शितोळे यांनी केला आहे. नागरिकांची गैरव्यवस्था होऊ नये, अशी साधी इच्छा सुद्धा प्रशासन व सत्ताधाऱ्यांची नाही. त्यामुळे या प्रमुख उत्सवाचा सुद्धा अवमान होत आहे, हे खेदाने म्हणावेसे वाटत आहे. कदाचित फुकटचे पुण्य सुद्धा नको. कारण याच्यात कुठलीही मलई दिसत नाही. त्यामुळेच गणपती बाप्पाच्या उत्सवात कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही, असा आरोप शितोळे यांनी केला आहे.

शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या विविध घाटांवर विसर्जनास बंदी आहे. गणपती विसर्जन झाल्यास व त्यातून कोरोनाचा संसर्ग संपूर्ण शहरात वाढल्यास त्यास पूर्णपणे प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असतील. परंतु, ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर एक दिवसात सुद्धा सर्व प्रकारचे नियोजन होऊ शकते. अशा वेळी तातडीने सत्ताधारी प्रमुख, विरोधी प्रमुख व प्रशासनाने मिळून नियोजन करावे, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button