भीतीदायक : पिंपरी-चिंचवडमधील एका उड्डाणपुलावर नारळ, लिंबु आणि व्हिसकीची बाटली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/pimpari-news3.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील एका उड्डाणपुलावर नारळ, लिंब, केळी ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फ्रेंडशिप डेच्या पूर्व संध्येला हा प्रकार पाहून हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
कासारवाडी येथील पुणे-मुंबई मार्गावर उभारलेला भारतरत्न JRD टाटा उड्डाण पुलावर हा प्रकार घडला आहे. या पुलाचा एक भाग पिंपळे सौदागर हा अत्यंत उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू परिसरात उतरतो. या परिसरातील शेकडो नागरिक आणि खास करून तरुण तरुणींची मोठी वर्दळ असते. या पुलावर मध्यभागी एक दारुची बाटली, 3 लिंबू आणि 3 केळी ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला लोकांना वाटलं हे साहित्य कुणाच्या तरी पिशवीतून पडले असावेत. पण, ज्या पद्धतीने याची मांडणी केली होती, ते पाहून नागरिकांना हा भलताच प्रकार असल्याचा भास होऊ लागला. हा प्रकार पाहुन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
फ्रेंडशिप डे सारखे दिवसही इथे साजरे केले जातात. त्यासाठी म्हणून एखाद्या तरुणाने हा प्रकार केल्याची शंका व्यक्त करत पुलावर कुणी तरी नारळ, लिंब, दारूची बाटली आणि केळी ठेवल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते राजू कदम यांना नागरिकांनी दिली. ते तिथे तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी हा प्रकार केवळ थोतांड असल्याचं सांगत सगळ्या वस्तू उचलून सोबत नेल्या. सुशिक्षित शहरातही असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात घबराहट पसरली होती. मात्र, हे केवळ अंधश्रद्धा असून त्यावर विश्वस ठेऊ नका, असं आवाहन राजू कदम यांनी केलं.