breaking-newsपिंपरी / चिंचवड
बारामतीचे पाणी बंद करण्याचा निर्णय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपवर संताप
पिंपरी, (महाईन्यूज) – भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारं निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. गिरीश महाजन यांनी याबाबत आदेश दिले असून येत्या दोन दिवसात लेखी आदेश निघणार आहेत. परंतु, भाजपच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टिकात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप सुडाचं राजकारण करत असल्याचा संताप कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 ला करार बदलत बारामतीला 60 टक्के पाणी दिलं होतं. 2017 मध्येच हा करार संपला होता. मात्र, तरीही बारामतीला जाणारं पाणी सुरूच होतं. रणजितसिंह मोहिते पाटील आणि नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करुन बारामतीचं पाणी वळवण्यासाठी प्रयत्न केला आहे. पवार काका-पुतण्यांच्या निर्णयाला दोन्ही रणजितसिंहांनी शह दिलाय. बारामती आणि इंदापूरला निरा डाव्या कालव्याचं आवर्तन बंद केल्याने फार मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पाण्यासाठी संघर्ष होतोय की काय? पाण्यासाठी आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.
सत्तेचा दुरुपयोग करून भाजप सुडाचं राजकारण करु पाहत आहे. निरा डाव्या कालव्याचं बारामतीला जाणारं पाणी बंद केल्यानंतर तेथील शेतकरी, छोटे-मोठे उद्योजक आणि शेती व्यवसाय करणा-यांचे अतोनात हाल होणार आहेत. त्यांना व्यवसायाला मुकावे लागणार आहे. पवार घराण्याशी असलेली सुडाची भावना बाळगून भाजपचे नेते व्यवसायिकांवर अन्याय करत आहेत. भाजप नेत्यांच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत.
ज्ञानेश्वर कस्पटे, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ते