बहिणीला सोडण्यासाठी आलेल्या भावाला सासरच्यांनी मारहाण करून लुटले
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माहेरहून पैसे आणले नाहीत म्हणून मुलीच्या भावाला बेदम मारहाण करून जवळील दीड लाख रुपयांचे दागिने लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी (दि. 28) मध्यरात्री च-होली बु येथील भोसले वस्ती याठिकाणी घडला. याप्रकरणी सासरच्या चारजणांवर दिघी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
आश्रुबा दत्तु आव्हाड (वय 45), गणेश आश्रुबा आव्हाड (वय 27, सध्या रा. नवी मुंबई), बाबु आश्रुबा आव्हाड (वय 25, सर्व रा. घाटशीळ पारगाव, ता. शिरुर, जि. बीड) आणि नारायण दहीफळे (रा. नवी मुंबई, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवाजी उर्फ शिवराज जनार्दन बांगर (वय 32, रा. सौंदाना, ता. जि. बीड) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज यांच्या बहिणीचे लग्न आव्हाड यांच्या परिवारातील मुलासोबत 2011 मध्ये झाले. लग्नात काही रक्कम देणे बाकी राहिल्याने घर बांधण्यासाठी विवाहितेच्या कुटुंबियांनी उर्वरीत रक्कम दिली होती. तरीही, सासरकडून आणखी पैशांची मागणी केली जात होती. दरम्यान, विवाहिता बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. बाळंत झाल्यानंतर सासरी यायचे असेल तर सोबत पैसे घेऊन यावे, अशी सूचना पती आणि सास-याने केली होती. परंतु, विवाहितेला सोडण्यासाठी त्यांचा भाऊ शिवराज तिच्या सासरी आला. त्यावेळी पैशाच्या भांडणावरून विवाहितेच्या पती आणि सास-याने मिळून शिवराज यांना शिवीगाळ केली. त्यांनी धारदार कत्तीने मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यावेळी शिवराज यांच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याची चैन आणि खिशातील रोख रक्कम असा 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. भुजबळ करत आहेत.