पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या दोन्ही आमदारांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीत कोणत्या सूचना मांडल्या?
– राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप पवार यांचे यांचा सवाल
– भाजपाच्या आमदारांकडून होतेय टिका-टिप्पण्णीचे राजकरण
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील भाजपाचे दोन्ही आमदार राज्य सरकारकडे बोट दाखवीत आहेत. वास्तविक, शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत काय मुद्दे मांडले आणि काय सूचना केल्या? त्याला पालकमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप पवार यांनी उपस्थित केला आहे.
संपूर्ण देशात कोविड-19 च्या विषाणुने थैमान घातले आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपआपल्या परीने उपाययोजना करीत आहे. मात्र, भाजपाचे प्रदेश नेत्यांनी ‘कोविड’चे राजकारण करण्याची भूमिका घेतली. प्रदेश नेत्यांच्या सूरात सूर मिसळत भाजपाच्या स्थानिक आमदारांनी टीका-टिप्पण्णीचे राजकारण सुरू केले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या आमदारांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
संदीप पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील भाजपाच्या विद्यमान दोन्ही आमदारांनी पूर्वाश्रमी राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. अजितदादांच्या कामाची पद्धत तुम्हाला माहित आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितील लोकांना मदत करण्यासाठी जिथे सरकार कमी पडत असेल, तिथे विरोधी पक्षातील लोकांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. मात्र, तसे न करता भाजपा आमदारांकडून महाविका आघाडी सरकारवर टिका-टिप्पण्णी केली जात आहे.
पालकमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकप्रतिनिधींच्या बैठकीला भाजपाचे दोन्ही आमदार उपस्थित होते. या बैठकीत दोन्ही आमदारांनी पिंपरी-चिंचवडसाठी कोण-कोणत्या सूचना केल्या. याबाबत सविस्तर बोलले पाहिजे. त्या सूचनांना प्रतिसाद मिळाला नसेल, तर आरोप आणि आक्षेप घेणे योग्य होईल. अन्यथा निराधार आरोप करुन आमदार काय साध्य करणार आहेत? असा सवालही पवार यांनी उपिस्थत केला आहे.
शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप, मोफत जेवण, स्थलांतरित मजुरांना प्रवासाची सुविधा, वैद्यकीय यंत्रणा सक्षम करुन जास्तीत-जास्त रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योग आणि मोठे उद्योग सुरू व्हावेत. यासाठी सरकारने परवानगी दिली आहे, असे असताना भाजपाचे दोन्ही आमदार महाविकास आघाडी सरकारने ‘आर्थिक पॅकेज’द्यावे, अशी मागणी करीत आहेत, ही बाब सर्वसामान्य नागरिकांना पटणारी नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.
तसेच, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी, ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यामध्ये राज्य सरकार काय-काय उपाययोजना करीत आहे. याबाबत सूतोवाच केले आहे. केवळ पॅकेज आणि घोषणाबाजी करुन चालणार नाही, तर लोकांना काय मदत हवी. याबाबत सरकार प्रयत्न करीत आहे. आता पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांशी संबंधित काही समस्या असतील, तर दोन्ही आमदारांनी सूचना नक्की कराव्यात. पण, राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली…नागरिकांना वाऱ्यावर सोडले…असे आक्षेप घेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नयेत. कोविड-19 च्या संकटात राजकीय संधी शोधण्याचा प्रकार योग्य नाही, असेही संदीप पवार यांनी म्हटले आहे.