पिंपरी-चिंचवडकरांवरील पाणी कपात त्वरीत मागे घ्या- सचिन चिखले
पिंपरी, (महाईन्यूज) – शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरणात पुरेसा साठा झाला आहे. तरी, पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेली दिवसाआड पाणी कपात त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
यासंदर्भात चिखले यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून महापालिका दररोज ४८० ते ५०० एमएलडी पाणी उचलते. सध्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस आहे. आजचा धरणातील साठा ९८ % आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटलेला आहे. पाणी कपातीमुळे काही भागांमध्ये कमी पाणी पुरवठा व काही भागांमध्ये जास्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांवर लादलेली दिवसाआड पाणी कपात त्वरीत काढून घ्यावी. नागरिकांना दररोज शुध्द पाणी पुरवठा करावा, अशी मागणी चिखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.