नैसर्गिक अपंगत्वावर मात करत श्रृतीने मारली बारावीच्या परिक्षेत बाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/IMG-20180531-WA0002.jpg)
- लेखनिकेच्या सहायाने मिळविले 54 टक्के गुण
- यशाबद्दल मनविसेतर्फे श्रृतीचे कौतुक
पिंपरी – शहरातील शितोळेनगर येथील श्रुती श्रीकांत पंडीत ही विशेष विद्यार्थीनी प्रौढ लेखनिकेसह बारावीच्या परिक्षेस बसली होती. श्रुती ही विशेष विद्यार्थीनी असल्याने ती इतर सर्वसामान्य मुलामुलींप्रमाणे लिहु व बोलु शकत नाही. तिला लगेच समजेल असेही नाही. या गोष्टींमुळे आठवीनंतर तिचे शाळेत जाणे बंद झाले होते. मात्र, तिने सर्व अडचणींवर मात करत इयत्ता १२ वीच्या परिक्षेत ५४ टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला आहे.
वडील श्रीकांत पंडीत व आई सौ. माधवी पंडीत यांनी आपल्या मुलीने शिकावे, तिला ईतरांप्रमाणे स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी मनाशी खुणगाठ बांधली. त्यांनी मार्च २०१६ मध्ये दहावी परिक्षेचा सतरा नंबर अर्ज भरून श्रुतीला दहावीला बसविले. दहावीच्या परिक्षेत श्रुतीला ५० टक्के गुण मिळाले आहेत. दहावीत यश मिळविल्यानंतर त्याचप्रमाणे आपल्या अपंगत्वावर मात करीत तिने इयत्ता १२ वीच्या परिक्षेत ५४ टक्के गुण मिळवले आहेत.
शासन निर्णयानुसार अशा विशेष विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परिक्षेसाठी लेखनिक घेण्याची मुभा असली, तरी आतापर्यंत लेखनिक परिक्षार्थी विद्यार्थ्यांपेक्षा लेखनिक वयाने लहान राहिला आहे. मात्र, विशेष विद्यार्थ्यांना १५ फेब्रुवारी २०१६ रोजी शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांपेक्षा प्रौढ लेखनिक घेवून परिक्षा देण्याची मुभा मिळाली आहे. त्यानुसार श्रुती लेखनिकेसह बारावी पास झाली. श्रुती ही एकुलती एक मुलगी आहे. आई खाजगी नोकरी करते. तर, वडील हे घर, व्यवसाय सांभाळुन श्रुतीची पुर्णवेळ काळजी घेतात.
श्रुतीला स्मार्ट फोन हाताळता येतो. तिला चित्रकलेचाही छंद आहे. श्रुती जन्मताच ५० टक्के सौम्य (मतिमंद) दिव्यांग आहे. श्रुतीला बारावीपर्यंत शिकविले तरी पुढे काय? असा प्रश्न पंडीत दांपत्याला पडला आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिला लेखनिकाची सुविधा मिळणार नाही. श्रुतीचीही शिकण्याची ईच्छा आहे.
लेखनिकेचे भावुक उद्गार
पदवीपर्यंत अशा विद्यार्थ्यांना लेखनिकेसह परिक्षेची सवलत असायला हवी. श्रुती नक्कीच पुढचे शिक्षण पूर्ण करेल. असे तिच्या आईने यावेळी मत व्यक्त केले. तर, माझा हा लेखनिक म्हणून परिक्षा देण्याचा पहिलाच अनुभव आहे. श्रुतीला समजवण्यासाठी मला आधी तिच्याशी मैत्री करावी लागली. अशी मुले खुप हळवी असतात. मात्र, त्यांच्याशी मिळुन मिसळुन आईच्या ममतेप्रमाणे माया करावी लागते. ती काय बोलते, कशी उत्तरे देते हे समजुन घेवुन तिच्याशी मैत्री करावी लागते, असे श्रुतीच्या लेखनिक राहिलेल्या प्रियंका हांडे यांनी सांगितले. या यशाबद्दल श्रुतीचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी शहर सेनेतर्फ सत्कार करण्यात आला.