देशाच्या फाळणीची भाषा विरोधक करु लागलेत – आदित्य ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/images_1527509417503_aditya_thackeray.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – काॅंग्रेससह विरोधकाकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत. जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम कायम ठेवू आणि सत्ता आल्यास दोन पंतप्रधान करू, अशी देश फाळणीची भाषा विरोधक व त्याचे मित्रपक्ष करीत आहेत, अशी टीका शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी केली. आम्ही ३७० कलम रद्द करणार आहोत. राष्ट्रवाद आणि केलेल्या विकास ही आमची भूमिका आहे. संपूर्ण राज्यातील भगवे चित्र पाहता, सर्वच्या सर्व ४८ जागा शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती जिंकणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी वाजतगाजत रॅली काढत शक्तीप्रदर्शन करीत मंगळवारी (दि.९) उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. अर्ज भरताना पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेत्या नीलम गोर्हे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, महायुतीचे नेते, पदाधिकारी, नगसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, प्रचार, रॅली, संवाद या माध्यमातून राज्यभरात फिरत आहे. सर्वत्र भगवे वातावरण असून, महायुतीच्या विजयाची खात्री वाटत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीकडे प्रचाराचे मुद्दे नसल्याची टीका त्यांनी केली.
खा. बारणे म्हणाले की, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झाले होते. यंदा ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक पारा असताना संपूर्ण पवार कुटुंब प्रचारासाठी फिरत आहे. पराभव दिसत असल्याने त्याच्यावर ही वेळ आली आहे. पाच वर्षांत केंद्राच्या माध्यमातून केलेली कामे आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहता माझा विजय नक्की आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते त्याच-त्याच विषयावर वारंवार बरळत आहेत, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली.