तुकोबांनी नीतिमत्ता, शील आणि जगण्याचा मार्ग समाजाला दिला – सतीश काळे
– जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात
पिंपरी | प्रतिनिधी
‘संताची भुमी म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळेपण संपुर्ण जगासमोर आहे. यामध्ये अध्यात्माबरोबर विज्ञानवादी संत म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही संताच्या कार्याचा प्रभाव जनमानसावर तसाच टिकुन आहे. नीतिमत्ता, शील आणि जगण्याचा मार्ग संत तुकाराम महाराज यांनी संपुर्ण आयुष्यभर समाजाला दिला, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केले.
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
पुणे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदचे जिल्हाध्यक्ष संतोष बादाडे, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, राजेंद्र देवकर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष नकुल भोईर, सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार, सागर तापकीर, नितीन इंगवले, अशोक सातपुते, दादा पाटील, विजय क्षिरसागर आदीसह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
काळे म्हणाले की, संत म्हणजे समाजसेवा, संत म्हणजे समानता, संत म्हणजे त्याग आणि समर्पण आहे. तुकाराम महाराज हे निर्भिड व एका अर्थाने विद्रोही संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. तुकोबांच्या अभंगाशिवाय कीर्तन पूर्ण होत नाही. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे संत म्हणजे जगतगुरु तुकाराम महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील तुकाराम महाराज यांच्या विचारांचा पगडा दिसतो. म्हणूनच स्वराज्य निर्मिती मध्ये संत तुकाराम महाराज यांचे मोलाचे योगदान दिसून येते, असे प्रतिपादन या वेळी काळे यांनी केले.





