breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कामगार कल्याण मंडळाला भूखंड द्या, अन्यथा मगर स्टेडीयमवर ताबा घेणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/PHOTO-4.jpg)
राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांची माहिती
पिंपरी (महा ई न्यूज ) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला महापालिकेने प्राधिकरणाकडून दोन भूखंड ताब्यात घेवून देणार होते. अद्याप महापालिकेेने भूखंड दिलेले नाहीत. त्यामुळे तत्काळ भूखंड द्या नाही तर आण्णासाहेब मगर स्टेडियमचा ताबा घेणार आहे, असा इशारा मंडळाच्या माजी सदस्या भारती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंझुर्डे, कार्याध्यक्ष मुकुंद वाखारे,रामकृष्ण राणे, मोहन गायकवाड, पंकज पाटील, माणिनी फौंडेशनच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
चव्हाण म्हणाल्या की, आमच्या मागणीनुसार कार्यवाही न झाल्यास कामगार रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी लढा उभारुन स्टेडियमच्या ताबा घेतील. २००३ मध्ये पाठपुरावा केल्यानंतर सर्व्हे नंबर ५ मोशी येथे दोन एकर, सेक्टर नंबर २५, प्लॉट क्रमांक २९० येथे २५०००चौ.फुट, सेक्टर २६ जलतरण तलावाजवळ दोन एकर, थेरगाव सर्व्हे नंबर ९ मध्ये दिड एकर, चिंचवड सर्व्हे नंबर १९५ येथे २०००० चौ.फुट. असे भूखंड देण्याचे ठरले, यापैकी चिंचवड सर्व्हे नंबर १९५ मधील जागा ताब्यात मिळाली आहे.
१९९२ पासून २०१८ पर्यंत २६ वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेने कामगार कल्याण मंडळास भूखंड हस्तांतरित केलेले नाहीत. त्यामुळे लाखो कामगारांवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाची वेळोवेळी कामगार कल्याण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, कामगार मंत्री, कामगार कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ सदस्य, पिंपरी चिंचवड मधील सर्व कामगार नेते, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ, गुणवंत कामगार, मी स्वतः आणि अनेक कामगार कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. वारंवार सुधारित करार करुनही सर्व कराराचा भंग मनपाने केला आहे, त्यामुळे आता आण्णासाहेब मगर स्टेडियम ही महाराष्ट्रातील कामगारांच्या कष्टाच्या निधीतून उभी राहिलेली हक्काची वास्तु त्वरित कामगार कल्याण मंडळास विना विलंब परत करावी अशी आमची मागणी आहे.