‘एमपीएससी’ परीक्षा रद्द करा, अन्यथा परीक्षा केंद्र उध्वस्त करू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
पुणे / पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘एसईबीसी’चे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात याव्यात. जोपर्यंत वटहुकूम जारी होत नाही, तोपर्यंत परीक्षा घेण्यात येऊ नयेत. अन्यथा, 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील एकाही परिक्षा केंद्रावर परीक्षा होऊ देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
मुख्यमंत्री, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे MPSC येत्या ११ आक्टोबर व २२ नोव्हेंबर २०२० रोजी अनुक्रमे राजपत्रित व अराजपत्रिक (SIT,PSI,ASO) व इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या जाहिराती व अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती पुर्वीची असून संबंधित अर्जामध्ये SEBC अंतर्गत मराठा समाजाला जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगितीच्या पाश्र्वभूमीवर MPSC मधील SEBC च्या आरक्षणावरील शासनाची भूमिका जाहिर न करताच MPSC च्या परीक्षा घेण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.
MPSC च्या परीक्षा देण्या-यांमध्ये ग्रामिन भागातील मराठा गरीब विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून या स्पर्धा परीक्षा त्यांच्या भवितव्यासाठी मोठी संधी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळे मराठा समाजातील तरुण हताश व हतबल झालेला आहे. एकूणच सध्यपरिस्थिती संभ्रमाची व गोंधळाची झालेली आहे. अशा वातावरणात मराठा आरक्षणावीना परीक्षा घेणे म्हणजे मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे होईल.
MPSC च्या परीक्षामधील SEBC चे आरक्षण वटहुकूम काढून अबाधित ठेवूनच परीक्षा घेण्यात याव्यात. जोपर्यंत वटहुकूम जारी होत नाही, तोपर्यंत MPSC च्या परीक्षा घेण्यात येवू नयेत. मराठा आरक्षणाविना MPSC च्या परीक्षा लादण्याचा प्रयत्न करु नये. अन्यथा समाज भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. येत्या ११ आक्टोबरला महाराष्ट्रातील एकाही परिक्षा केंद्रावर परीक्षा होऊ दिली जाणार नाही. मराठा समाजाच्या होणा-या या उद्रेकाला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार असेल याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राहूल पोकळे, पुणे जिल्हा समन्वयक सतिश काळे, परमेश्वर जाधव, अमोल देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत.