आई जिजामातेला गुरुस्थानी माणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले – डॉ. नितिन करमळकर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आई जिजामातेला गुरुस्थानी मानून पारतंत्रात गुरफटत चाललेल्या महाराष्ट्राचा विचार करुन जनतेचे स्वराज्य निर्माण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असे मत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमळकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व बाबुराव घोलप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सलग १८ तास शिवचरित्र वाचनाच्या उपक्रमाचे उद्धाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, नगरसदस्य संतोष कांबळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम, संतोष ढोरे, बाबुराव घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, लेखक नामदेवराव जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाबुराव घोलप महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व मोठ्या संख्येने सातारा, सांगली, कोल्हापुर, नाशिक, सोलापुर येथुन आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरु म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक क्षेत्रातील व्यवस्थापन अतिशय उत्तम होते. याचे उदाहरण देताना त्यांनी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे उदाहरण दिले. आजही हा किल्ला ३५० वर्षानंतरही जसाच्या तसा आहे. यावरुन महाराजांची आरमार विषयक कुशलता दिसून येते. यावेळी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अशाप्रकारच्या वाचनातून समाजात देशभक्तीची प्रेरणा निर्माण होईल असे मत व्यक्त केले.
यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अॅड. संदिप कदम, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, लेखक नामदेवराव जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उपक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले तर आभार संतोष ढोरे यांनी मानले.





