breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड: महापालिका क्षेत्रातील प्रक्रियायुक्त सांडपाणी सिंचन वापरासाठी प्रोत्साहन!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती : पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

पिंपरी । प्रतिनिधी

राज्यात सांडपाणी व मैला- रसायनमिश्रीत दुषित पाणी अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करुन सिंचनासाठी देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नागपूरच्या धर्तीवर मोशी कचरा डेपोवरील लिगसी वेस्टला ‘वेल्थ’मध्ये परावर्तीत करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. बायोमायनिंगच्या माध्यमातून कचराच्छादित जमीन मोकळी केली जाणार आहे. नदी-नाल्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे. सांडपाणी थेटपणे नदीत सोडता येणार नाही, असे सरकारचे धोरण आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील आरक्षण क्र. १/१६ येथे उभारण्यात आलेल्या नवीन टाऊन हॉलसह तब्बल १ हजार ५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी फडणवीस बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष शंकर जगताप, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त आयुक्त शेखर सिंह, माजी नगरसेवक, पदाधिकारी व महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चिखली ग्रामस्थ व संतपीठा प्रशासनाच्या वतीने तुकोबांची पगडी, मृदंग देवून सन्मान करण्यात आला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांच्या हातांना काम देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती वंदना उपक्रम हाती घेतला. याद्वारे अर्थचक्रामध्ये महिलांचे योगदान घेण्याचा प्रयत्न केला. यासह कौशल्य विकास महत्त्वाचे असून, त्यामुळे रोजगार निर्मितीला मदत होणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारसोबत मनोरंजन-प्रबोधनासाठी सिटी सेंटर उपयोगी ठरेल. शहर चांगले करायचे असेल, तर रस्ते, पाणी आणि अन्य पायाभूत सोयी-सुविधा प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्ही चाकांनी चांगले काम करीत प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या छायेतील शहर असे न राहता. आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी ६ हजारच काय? आणखी हजारो कोटी रुपयांची कामे आमदार महेश लांडगे घेवून आले, तरी आम्ही ती करणार आहोत, असा विश्वासही फडणवीस यांनी दिला.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मैलाशुद्घीकरण प्रकल्प, चिखली टाऊन हॉलचे उद्घाटन, महिला बचत गट सक्षमीकरण ‘सक्षमा’ प्रकल्प, रोजगार व प्रशिक्षणाच्या ‘कौशल्यम’ प्रकल्प, नवी दिशा प्रकल्प, १७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम NCAP अंतर्गत प्रकल्प, प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र विकसित करणे, तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी चऱ्होली येथील निवासी सदनिकांचे लोकार्पण निगडी येथील जय ट्रेडर्स समोर पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात येत आहे, असे सांगितले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, २०१७ पासून २०२२ पर्यंत आणि आता महायुतीच्या काळात सुमारे ५ हजार कोटी रुपयांची कामे या परिसरात झाली आहेत. त्याचे श्रेय सर्वपक्षीय नगरसेवक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनालाही जाते. सर्व भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या म्हणून विकासकामे झाली. त्यांचे खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच सर्व विकासप्रकल्प मार्गी लागले. मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी वेस्ट टू एजर्नी, बायोमायनिंग, सीएनडी वेस्ट, बायोगॅस निर्मिती असे अनेक प्रकल्प निर्माण झाले. ‘फ्युचर सिटी’ पिंपरी-चिंचवड असा उल्लेख करीत फडणवीस यांनी शहराच्या विकासाला चालना दिली. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प, वीज वितरणासाठी उपकेंद्र आणि विविध ४०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील पहिले संतपीठ, २००८ पासून शास्तीकर पूर्णपणे माफी करण्यासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला. शास्तीकर माफी, उपयोगकर्ता शुल्क रद्द करताना किंवा विकासकामे करताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही कोणताही जात-धर्म किंवा पक्षीय भेदभाव केला नाही, असे गौरोद्गारही लांडगे यांनी काढले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या स्मारकासाठी फडणवीस यांच्या पुढाकाराने जागा मिळाली, असेही लांडगे यांनी सांगीतले.

आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

‘नटसम्राट’ कोण हे जनता जाणते…

संत तुकाराम महाराज यांच्या नावाने सुरू होत असलेले नाट्यगृह सुरू होत आहे. या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही जगद् गुरू तुकाराम महाराज यांना दिलेली वंदना आहे. पण, सध्या राज्यात नाट्यगृहाबाहेरील नाटकांची चर्चा अधिक आहे.‘‘गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥’’ या जगद् गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे राज्याच्या राजकारणात कोण अंगाला राख लावून घेत आहे, हे लोकांना माहिती आहे. मनातील कथा कथाकथन करीत आहे. संशयकल्लोळ सुरू आहे. नटसम्राटासारखे वागले म्हणून नटसम्राट होत नाही. त्यामुळे चुकीचे वागल्यास कट्टयार काळजात घुसणार आहे. त्याची वेदनाही सहन करावी लागणार आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डंपर पलटी केलाच आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button