पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पावरुन भाजपासह विरोधक असमाधानी?
पिंपरी । प्रतिनिधी
महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. निधी वाटपात अन्याय केल्याची टीका विरोधकांनी केली. निधी वाटपात असमतोल असल्याची टीका सत्ताधारी भाजपसह विरोधीपक्षातील सदस्यांनी केली. भाजपच्या सत्तेत एकही दिखाऊ काम नाही, अशी टीका करून भाजप सदस्यांनी घरचा आहेर दिला.
महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केल्यानंतर शुक्रवारी (दि. २६) विशेष सभा घेण्यात आली. गेले चार वर्ष विनाचर्चा अर्थसंकल्प मंजूर केला जात होता. त्यामुळे आजच्या सभेत चर्चा होणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, महापौर उषा ढोरे यांनी सर्वांना बोलण्यास संधी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांनी मोजक्या शब्दांत मत मांडावे, असे आवाहन महापौर यांनी केले.
त्यानंतर माजी महापौर मंगला कदम यांनी फेब्रुवारीला सभा घेणे अपेक्षित असताना एक महिन्याने घेतली. चर्चा करण्याचा उपयोग आहे का, याबाबत खुलासा करावा. त्यावर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, मार्चअखेरपर्यंत अर्थसंकल्पवर चर्चा करता येणार आहे. कायदेशीर उपसूचना स्वीकारल्या जाणार आहेत.
मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, कोरोना वाढत असताना हॉस्पिटल सज्ज करणे आवश्यक आहे. निधी वाटपात राजकारण होत आहे. प्रभाग १ ला ४० कोटी, ११ ला ४५ कोटी आणि प्रभाग १२ ला ६ कोटी दिले आहेत. हा अन्याय आहे.
माजी महापौर वैशाली घोडेकर म्हणाल्या, ” अर्थसंकल्पात जी कामे जाहीर केली ती होणार आहेत का. फुगीर बजेट आहे. एकही पैसा केंद्र सरकारकडून आला नाही. कोरोनाच्या नावाखाली अर्थसंकल्पात विकासकामांना पुरेसा निधी दिलेला नाही. केवळ भाजपच्या काही ठरावीक पदाधिकाऱ्यांनाना बजेटमध्ये झुकते माफ देण्यात आले असून, विरोधी पक्षाचे नगरसेवक असलेल्या प्रभागाला निधी दिलेला नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली.
तसेच भाजपातील स्वपक्षीय नगरसेवकांनीही निधी वाटपात आमच्यावर अन्याय केल्याचा पाढा वाचला. अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह विरोधी पक्षानेही टीका केली.
माजी उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या, आम्ही समाधानी नाही. बजेट मिळाले नाही. आशा शेंडगे म्हणाल्या, “ बजेट खर्ची पडत नाही. भाजपच्या सत्तेतही नदीसुधार प्रकल्प होऊ शकला नाही. शत्रुघन काटे म्हणाले, दहा वर्षात इंद्रायणी, पवना सुधार प्रकल्पात कोणतीही प्रगती झाली नाही. माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले. चांगला अर्थसंकल्प असून उत्पन्न वाढत आहे. लेखापरीक्षणातील वसुली व्हायला हवी.